वाचक लिहितात   

भारताकडून चोख प्रत्युत्तर
 
ऑपरेशन सिंदुर यशस्वी करून भारतीय सैन्याने पहलगाम येथे मरण पावलेल्या २६ पर्यटकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याची ही कामगिरी अभिमानास्पद आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणार्‍या भारतीय सैन्याच्या या गौरवपूर्ण कामगिरीने १५० कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. जो भारताकडे तिरक्या नजरेने पाहिल त्याला भारत घरात घुसून मारेल असा इशाराच भारताने या मोहिमेद्वारे पाकिस्तानला दिला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍यांची गय केली जाणार नाही. हे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ही मोहीम यशस्वी करून भारतीय सैन्यदलाने आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आर्थिक आणि लष्करी मदत करणे चालूच ठेवले, त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागले. आता तरी पाकिस्तानने शहाणे व्हावे व दहशतवाद्यांना केली जाणारी लष्करी व आर्थिक मदत थांबवावी.
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे.
 
योग्य माहिती जनतेला द्या
 
ऑपरेशन सिंदूर या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी कारवाईबाबत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच माहितीच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरली आहे. या परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, हवाई दलातील अधिकारी व्योमिका सिंग आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी उपस्थित राहून जनतेसमोर अधिकृत माहिती दिली. हे तिघेही आपल्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी अधिकारी असून, त्यांनी संयमित आणि स्पष्ट भाषेत ऑपरेशनच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल माहिती दिली. अशा संवेदनशील घडामोडींच्या वेळी सरकार आणि लष्कराकडून थेट संवाद साधणे हे लोकशाहीचे बलस्थान आहे. अफवांना आळा घालण्यासाठी आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी ही पत्रकार परिषद महत्त्वाची ठरली. माध्यमांनीही ही जबाबदारी लक्षात घेऊन अधिकृत सूत्रांवर आधारित आणि संवेदनशीलतेची जाण ठेवून बातम्या द्याव्यात, अशी अपेक्षा आहे.
 
दीपक काशिराम गुंडये, वरळी.
 
पाकिस्तानला इशारा
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एकीकडे सरकारने देशभरात युद्धसराव अर्थात मॉकड्रील करण्याचे आदेश दिले असताना आणि नागरिक त्या दृष्टीने मानसिक तयारी करत असताना ’ऑपरेशन सिंदुर’ मोहिमेअंतर्गत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील एकूण ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. २०१६ मध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि २०१८ मध्ये केलेला बालाकोट एअरस्ट्राईक या नंतर भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी लष्करी कारवाई आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला दोन आठवडे उलटल्यानंतरही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता पसरली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे ही अस्वस्थता काही प्रमाणात दूर झाली.
 
प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
वाचाळवीरांनी सावधान
 
अलीकडे अनेक आमदार व मंत्री तसेच विरोधक हे अनेक विषयांवर आपले मतप्रदर्शन करीत असतात; पण ते करीत असताना जनतेच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आज अनेक संवेदनशील विषय आहेत. निवडणूक काळात सत्ताधारी पक्षाने दिलेली आश्वासने, बेरोजगारी, लाडकी बहीण योजना व त्यातील काहींची झालेली कपात, पहलगाममधील दहशतवादी हल्ला इत्यादी अशा विषयांवर राजकारणी व्यक्तींनी बोलल्यानंतर समाजामध्ये व माध्यमांमध्ये त्याविषयी चर्चा सुरु होते. काही ठिकाणी निषेध मोर्चे निघतात. त्यामध्ये पोलिसांना फौजफाटा पुरवावा लागतो. वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. राजकारणात कोणी काय बोलावे यावर काही बंधने नाहीत. तथापि आपल्या बोलण्यामुळे जनतेत असंतोष निर्माण होईल असे बोलणे टाळावे.
 
शांताराम वाघ, पुणे
 
पाकिस्तानबरोबर सामने नकोत
 
 पाकिस्तानबरोबर सामने नकोच! अशा प्रकारचे वक्तव्य भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर याने केले आहे. गौतम गंभीर याने जे मत व्यक्त केले आहे, ते योग्यच आहे. पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्याचा धर्म विचारून भ्याड हल्ला केला. त्यात २८ निरपराध लोक मारले गेले होते. याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पाकिस्तानी कारवाया जोपर्यंत थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेटसुद्धा खेळणे नको, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यांचे कडवट व जळजळीत भूमिकेचे हे शब्द आजही आठवतात. पाकिस्तानलाच भारताबरोबरचे संबंध सुधारावेत अशी मनोमन इच्छाच नाही, असे दिसते. 
 
गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
 
अलौकिक प्रतिभेचा - वैभव सूर्यवंशी
 
वयाच्या १४ व्या वर्षी तुम्ही काय करत होतात? हा मुलगा विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध सहजपणे फटकेबाजी करत आहे. वैभव सूर्यवंशी- नाव कायम लक्षात ठेवा!’ अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने व्यक्त केली. डावखुर्‍या वैभवने ’आयपीएल’ मधील आपल्या केवळ तिसर्‍या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूंत शतक साकारण्याची किमया साधली. त्याने या खेळीसह सार्‍यांनाच थक्क करून सोडले. यात युवराज, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश होता. 
 
वैभवची विक्रमी खेळी ही भारतीय क्रिकेटमधील अद्भूत प्रतिभेचे प्रतीक होती, असे हरभजन म्हणाला. ’आयपीएल’ला २००८मध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेच्या तिसर्‍या हंगामात २०१० मध्ये युसूफ पठाणने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ३७ चेंडूंत शतक साकारले होते. त्याच्या या विक्रमी खेळीच्या वर्षभरानंतर म्हणजेच २०११ मध्ये वैभव सूर्यवंशीचा जन्म झाला. आता याच वैभवने राजस्थानकडूनच खेळताना युसूफचा विक्रम मोडीत काढला आहे.
 
युसूफप्रमाणेच भारतीय क्रिकेटमधील अनेक नामांकितांनी वैभवचे कौतुक केले. वैभवचा निडरपणा, त्याच्या बॅटचा वेग, चेंडूचा टप्पा लवकर ओळखण्याची आणि प्रत्येक चेंडू तितक्याच ऊर्जेने मारण्याची क्षमता यामुळेच त्याला इतकी उत्कृष्ट खेळी साकारणे शक्य झाले. वैभव, खूप छान खेळलास अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने वैभवची स्तुती केली. भारताचे माजी सलामीवीर कृष्णमचारी श्रीकांत यांनी वैभवला ’भारतीय क्रिकेटमधील पुढील सुपरस्टार’ म्हणून संबोधले. वयाच्या १४व्या वर्षी अन्य मुले काहीतरी होण्याचे स्वप्न पाहात असतात, त्याच वयात वैभव ’आयपीएल’मध्ये जेतेपदासाठी दावेदार असलेल्या गुजरात टायटन्स संघाविरुद्ध शतक करत आहे. 
 
भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वैभवच्या खेळीला ’अविश्वसनीय’ म्हटले. सामन्यानंतर ’आयपीएल’चे प्रसारण करणार्‍या वाहिनीवर वैभवची प्रतिक्रिया घेण्यात आली. यावेळी माजी कसोटीपटू हरभजन सिंगने त्याच्याशी संवाद साधला. हरभजनने वैभवचा इथवरचा प्रवास जाणून घेतला आणि त्याचे कौतुक केले. तुझ्यामुळे भारतीय क्रिकेटमधील अद्भूत प्रतिभा पुन्हा अधोरेखित झाली, असे हरभजन म्हणाला.

Related Articles